"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग 31. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 29. आक्टोंबर 2022. "लग्नगाठ : जुळूनि येता रेशीमगाठी."
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
भाग 31.
29 आक्टोंबर 2022.
*"लग्नगाठ : जुळूनि येता रेशीमगाठी."*
लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात, असं आपल्याकडे मानलं गेलंय. मॅट्रिमोनी साइट्सपासून प्रेमविवाहापर्यंत आणि समलैंगिक विवाहापासून “सोलोगॅमी’पर्यंत अनेक ऑप्शन्स उपलब्ध असले तरी कोणत्याही मार्गानं बसलेली गाठ स्वर्गातच बांधली गेली असणार, असं मानणारी आणि लग्न पत्रिका /जन्म कुंडली /गुण पाहून लग्न करणारी असंख्य जोडपी (विशेष म्हणजे त्यांचे आईवडील) आजही आढळतात. त्यामुळे मुलामुलींची लवकर लग्न जमणे अवघड झाले आहे अन् झाले तरी टिकणेही मुश्कील झाले आहे. यामध्ये एकमेकांना दोष देणे आणि अगदी प्रसंगी कोर्टाच्या पायऱ्या चढतात.
नुकत्याच साजऱ्या झालेल्या वटपौर्णिमेसारख्या काही सणांमुळे ही भावना अधिकाधिक पक्की झालेली आहे. विवाह ही 'साताजन्माची सोबत’ असते, असंही आपल्याकडे मानतात. परंतु विद्यमान जोडीदाराबरोबर आपला नेमका कितवा जन्म चाललाय, याची खबर कुणालाच नसते. त्यामुळे प्रत्येक जन्मात ही सोबत पुढील सात जन्मांसाठी' रिन्यू’ केली जाते. अर्थात, औरंगाबादेत नुकत्याच साजऱ्या झालेल्या “पिंपळपौर्णिमा’ पाहून अनेकांच्या विचारांना तडा गेला.
पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत 'भांडखोर बायको पुढच्या जन्मी नको,’ अशी प्रार्थना केली. ”कामधंदा मी सोडून, फेऱ्या कोर्टात मारतो। पत्नीपीडित पुरुष, व्यथा माझी मी सांगतो।।” अशी गाणी म्हणत हा 'कार्यक्रम’ चालला होता. स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी तयार केलेले कायदे कसे एकतर्फी आणि पुरुषांवर अन्याय करणारे आहेत, अशा 'बाइट्स’ या मंडळींचे नेते मीडियाला देत होते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी, की या बातमीचे व्हिडिओ यू-ट्यूबवर हजारो लोकांनी पाहिले, अनेकांनी लाइक आणि शेअर केले. अनेकांनी या पुरुषांचं अभिनंदन करून 'हम तुम्हारे साथ है,’ वगैरे कॉमेन्ट्स गंभीरपणे केल्या.
अर्थात, पीडितांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा आजही कितीतरी अधिक आहे, हे मान्यच करायला हवं आणि पीडित महिलासुद्धा आजही वडालाच फेऱ्या मारतायत, हेही वास्तव आहे. परंतु पुरुषाला “पीडित’ म्हणावं, अशी एक घटना या वर्षी च्या वटपौर्णिमेला बिहारमध्ये घडली. लग्नाचा एक वेगळाच प्रकार या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आलाय. बिहारमध्ये त्याला “पकडौआ शादी'’ असं म्हटलं जातं. बेगुसराय, लखीसराय, मुंगेर, मोकामा, जहानाबाद, गया वगैरे भागात 1980 च्या दशकापासून ही “लग्नपद्धती"
प्रचलित आहे म्हणे!
बेगुसरायमधल्या एका जनावरांच्या डॉक्टरला सोमवारी फोन आला. “पेशंट’' तपासण्यासाठी तो घराबाहेर पडला, तो परत आलाच नाही. काल सकाळी त्याच्या आईच्या मोबाइलवर एक व्हिडिओ आला. त्यात तिच्या लेकाचा लग्नसोहळा सुरू असल्याचं दिसत होतं. आपल्या मुलाचं अपहरण करून “पकडौआ शादी'’ करण्यात आली, असा डॉक्टरच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. चांगला उपवर मुलगा हेरून त्याला पळवून न्यायचं आणि धमकी देऊन थेट बोहल्यावर बसवायचं, असं या लग्नाचं स्वरूप असतं. अशा लग्नगाठी नेमक्या कुठे बांधल्या जातात, ठाऊक नाही; परंतु “पकडौआ शादी’' रूढ होण्यामागे मुलींचा अशिक्षितपणा, हुंड्याची वाढती मागणी, चांगली नोकरी असलेल्या मुलांची कमतरता, अशी कारणं सांगितली जातात.
*“पकडौआ शादी'’ घडवून आणणाऱ्या टोळ्या रीतसर सक्रिय आहेत. त्यामुळेच लग्नाचा सीझन सुरू झाला, की उच्चशिक्षित, चांगला नोकरीधंदा असलेली मुलं घाबरून वावरू लागतात. असा मुलगा एकटा सापडला (तशी व्यवस्थाही टोळीच करते) की त्याचं अपहरण केलं जातं. तो लग्नाला तयार झाला नाही, तर प्रसंगी मारहाणही केली जाते. वधुवर सूचक मंडळांप्रमाणं या टोळ्यांकडेही विवाहयोग्य मुलांचा “बायोडेटा'’ असतो. लग्नगाठी कुठेही, कशाही बांधल्या जाऊ शकतात, हेच खरं! (काही वधूवर सुचक मंडळी निशुल्क आणि निस्वार्थीपणे समाजसेवा करत आहेत ही जमेची बाजू आहे)*
एकंदरीत लग्नसंस्था मोडकळीस आलेली आहे की काय अशी आता शंका येत आहे.
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग 30.
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
*"मनापासून : विवाह नकोसा? ."*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/30-9028261973-28-2022.html
वैज्ञानिक दृष्टिकोण.
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
29 आक्टोंबर 2022
पुढील भागात - *"पत्रिका पाहून लग्न करणे योग्य की अयोग्य?."*
Comments
Post a Comment