"पत्रिका आणि जन्म कुंडली चे गौडबंगाल"संकलन - साहेबराव माने. 9028261973 भाग 2
**********************
*"पत्रिका आणि जन्म कुंडली चे गौडबंगाल"*
भाग 2
🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
*भाग 2 : भूमिका*
पत्रिका जुळवणे हा प्रकार सध्या सुशिक्षित आणि मध्यमवर्गात विवाह ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहे. मुलामुलींचा बायोडेटा तयार करताना जन्मपत्रिकेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. कडक मंगळ असल्यामुळे लग्न जुळवताना अडचणी आल्या तर पत्रिकाच बदलणारे आणि बदलून देणारे महाभाग काही कमी नाहीत. जन्मपत्रिकेबरोबर बायोडेटामध्ये गण, नाडी, आदी संदर्भसुद्धा येतात. आपल्या मुलीचा गण राक्षस कसा ठरवला ? अथवा नाडी मध्य कशी येते ? याची यत्किंचितही कल्पना पालकांना नसते. बायोडेटामध्ये गण आणि नाडी टाकल्याशिवाय मात्र पर्याय नसतो, कारण छत्तीस गुणांची जुळवाजुळव करण्यासाठी सदरची माहिती 'तथाकथित गुरुजींच्या' दृष्टीने जरुरीची असते. मुलामुलीची पत्रिका जुळली की मुलीच्या आई वडिलांना होणारा आनंद अवर्णनीय असतो. परंतु *पत्रिका कशी जुळवतात ? याची बिलकुल कल्पना तमाम आई वडिलांना नसते. आपल्या मुलामुलींची पत्रिका जुळते अथवा का जुळत नाही ? यामागचे इंगित समजून घेण्यासाठी तथाकथित गुरुजींकडे किंवा ज्योतिषाकडे जाण्याची अजिबात गरज नाही. जरा डोकं चालवलं तर यामागील गौडबंगाल आपण समजून घेऊ शकतो. त्यामुळे भारतीय समाजाच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठी सर्व सुशिक्षितांनी हे गुणमिलन समजावून घेऊन सर्वसामान्यांना सांगण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.*
*यापूर्वी चा भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.*👇
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/09/1-9028261973.html
सन २००७ मध्ये भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ऐश्वर्याचे लग्न अभिषेक बच्चन यांच्याबरोबर होण्यात अडचण आलेली होती. ऐश्वर्याला कडक मंगळ होता. ज्योतिषाने भाष्य केलेलं होतं की ऐश्वर्याचे पहिले लग्न अभिषेक बरोबर झाले तर त्यांच्या जीवाला धोका होता. पर्यायाने ऐश्वर्याला संकटांना सामोरे जावे लागले असते. त्यामुळे ज्योतिषांनी ऐश्वर्याला असलेला कडक मंगळ सॉफ्ट करून घेण्याचे ठरवले. त्यासाठी ऐश्वर्याचे पहिले लग्न पिंपळाच्या झाडाबरोबर लावून देण्यात आले. आणि नंतर दुसरे लग्न अभिषेकबरोबर झाले. काय पण मोठ्यांची कडक मंगळ सॉफ्ट करण्याची पद्धत ! मुख्य म्हणजे मंगळ ग्रह ना ऐश्वर्याने पाहिला असणार, ना अभिषेकरावांनी, ना ज्योतिषांनी. *पण या खुळेपणाच्या समजूतीने ज्योतिषाचा मात्र आर्थिक फायदा झाला असणार हे निश्चित.*
*झाडाबरोबर लग्न केल्याने पिंपळाच्या झाडाचे भाग्य उजळले म्हणायचे की, समाजाचे मानसिकदृष्ट्या अध:पतन झाले, याचा विचार सुज्ञांनी करावा.*
कडक मंगळ कसा ठरवतात ? शनीची साडेसाती म्हणजे काय ? राक्षस गण कसा काढला जातो ? मध्ये नाडी कशी ठरवतात ? आठवा गुरू कसा येतो ? वैर वर्ग कसा काढतात ? कालसर्पयोग ही भानगड नेमकी काय आहे ? हे सर्व समजावून घेण्यासाठी आणि त्यामागील सामाजिक, सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण समजून देण्यासाठी हा पुस्तकप्रपंच. हे राजकारण योग्य की अयोग्य याचाही वेध आपण घेणार आहोत. पत्रिकेतील दोष आणि योग्य माहिती करून घेण्यासाठी गुरुजींची आवश्यकता, ना पुरोहितांची. आपणच आपल्या पाल्याच्या पत्रिकेतील दोष आणि योगांचा खरा शोध घेऊया. त्यांचा गण आणि नाडी काढत छत्तीस गुणांची जुळवाजुळव कशी आणि का केली जाते ? हे समजून घेऊया. हो पण हे एक मात्र नक्की की हे सर्व करत असताना आपली बुद्धी वापरूया आणि विचारही करूया. चला तर मग शोधायला आणि विचार करायला.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
27 सप्टेंबर 2022.
*क्रमश : - खगोलशास्त्र अभ्यासक डॉ. नितीन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना' पुस्तकातून साभार.*
Comments
Post a Comment