*कौमार्य चाचणी करण्याचे हे वाईट प्रकार आजही चालू आहेत, हे खरंसुद्धा वाटणार नाही...**विचारवेध - BEYOND THOUGHTS.*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 19 एप्रिल 2022.
*कौमार्य चाचणी करण्याचे हे वाईट प्रकार आजही चालू आहेत, हे खरंसुद्धा वाटणार नाही...*
*विचारवेध - BEYOND THOUGHTS.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
19 एप्रिल 2022.
काळ बदलत जातो तसा समाज विचाराने प्रगत होत जातो. त्या अनुषंगाने आपल्या समाजातील वाईट चालीरीती दूर करणे हे समाजाच्या निकोप वाढीसाठी आवश्यक असते.
जेव्हा आपण देशात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करतो तेव्हा, अशा अनेक अनिष्ट प्रथा सुरु असल्याचे आपणास दिसून येते. त्यापैकी एक म्हणजे स्त्री-पुरुष असमानता!
जेव्हा आधुनिक सुसंस्कृत समाजाचा विचार केला जातो तर त्यातील महत्वाचा घटक म्हणजे स्त्री-पुरुष समानता होय. याचा अर्थ स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव न करता सामाजिक जीवनात सर्वांना समान न्याय, प्रतिष्ठा, सन्मान मिळेल अशी व्यवस्था त्यासाठी उभे करणे अपेक्षित असते.
‘व्हर्जिन’ शब्दाचा जन्म नक्की कसा झाला? वाचा
यासाठी संविधानात अनेक तरतुदी करून स्त्रियांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थात तेवढेच प्रयत्न मात्र पुरेसे नाही. त्यासाठी आपली मानसिकता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे मानेवरचे जोखड आपल्याला बाजूला करता येणार नाही.
आजही अशा अनेक अनिष्ट प्रथा समाजात कायम आहेत. ज्या कुठेतरी आपण मध्ययुगीन समाजातच वावरत नाही ना? असा प्रश्न विचारण्यास भाग पाडतात.
यापैकीच राजस्थान मधील एक वाईट प्रथा ही ‘कुकरी प्रथा’ म्हणून ओळखली जाते. राजस्थानात वास्तव्य करणाऱ्या ‘सांसी’ समाजात ही कुप्रथा कायम असून आजही या विकृतीमुळे अनेक तरुण मुलींना त्रास भोगावा लागतो.
काय आहे ही प्रथा?
लग्नानंतर पहिल्या रात्री नवरा मुलगा आपल्या बायकोची “कौमार्य चाचणी” करून ती शुद्ध आहे किंवा नाही ही जाहीर करतो. त्यासाठी तो पांढऱ्या धाग्यांचा वापर करतो. त्या नवविवाहित तरुणीला माहीत असते की, आता आपल्यासोबत काय होणार आहे, ती असहाय असते.
सासरी तिची मदत कोणीच करत नाही. या कुप्रथेबाबत मात्र ती अनभिज्ञ मात्र नसते. तिला आपल्यासोबत काय होऊ शकते याचा अंदाज असतो. मात्र आपल्या जोडीदाराबद्द्ल तिला आशा असते की तो तिला यापासून वाचवेल. शेवटी असे काही होत नाही.
आपल्या घरच्यांच्या सांगण्यावरून तो मुलगा देखील या कुकृत्यात सामील होतो. अशा अनेक गोष्टी सर्वांसमोर येत असतात. काही वेळेस याबद्दल ब्रभा होतो तर, काही लोक याबाबत सोयीस्कर मौन पाळतात.
अशीच एक घटना समोर आली. एका तरुण नवविवाहितेला तिच्या नवऱ्याने “अशुद्ध” आहे म्हणून घोषित केले. मग सासरच्या लोकांनी तिला त्रास देणे सुरु केले. त्यासाठी मारहाणही होऊ लागली. त्या मुलीचा अनन्वित छळ होऊ लागला.
त्या तरुणीने आपण तसे काही नाही केल्याचे अनेकदा सांगून पाहिले. पण तिचे कोणाचकडून ऐकण्यात आले नाही. परंतु आता मुलीला तिचे तिच्या मेहुण्यासोबत शारीरिक संबंध होते असे कबूल करावे यासाठी जबरदस्ती करण्यात येत होती.
अखेर रोजच्या मारहाणीला कंटाळून तिने ‘तसे संबंध’ होते अशी कबुली दिली. इथे मेहुणाच का? तर त्याची आर्थिक स्थिती थोडी अधिक चांगली होती. आता त्या मुलीचे सासरचे लोक त्या मुलीच्या वडील आणि मेहुण्यांना त्रास देऊ लागतात.
हे प्रकरण पुढे जात पंचायतीसमोर आले. अशावेळेस जातपंचायत ही मात्र मुलाकडच्या लोकांना साथ देते हे ओघाने आलेच. कारण यातच सर्वांचा लाभ असतो. जातपंचायतीने मुलीचे वडील आणि मेहुणे यांना ‘नुकसानभरपाई’ म्हणून सासरच्या मंडळींना पैसे देण्यास भाग पाडले.
नुकसानभरपाईचे पैसे दिल्यावर मात्र या प्रकरणावर पडदा पडला.
पांढरपेशा मनाला झटका देणारं, वासनांध दुनियेचं विकृत वास्तव!
ही कुप्रथा सुरु होण्यामागे मध्ययुगीन समाजाचा स्त्रियांप्रती असणारा असमानतेचा दृष्टीकोन आणि सततच्या अस्थिरतेमुळे स्त्रियांवर होणारे अत्याचार ही कारणे आहेत. सतत परकीय आक्रमणे होऊन सामान्य लोक त्यात भरडले जात.
आक्रमक आपली लैंगिक गरज भागविण्यासाठी स्त्रियांवर अत्याचार करत. मग ती स्त्री शुद्ध आहे की नाही असा विचार समाज करत असे यातूनच ही कुप्रथा निर्माण झाली. पुढे काळ बदलला. मात्र पैशांच्या स्वार्थापायी ही कुप्रथा सुरूच राहिली.
आज तो हुंड्याव्यतिरिक्त पैसे उकळण्याचा एक मार्ग ठरला आहे. जातीच्या दबावाखाली हे पैसे देण्यास मुलीचा बाप तयार होतो. पैसे उकळण्यासाठी ही लोकं या थरापर्यंत जायला तयार असतात.
“कौमार्य चाचणी” करण्याचे अजून काही मार्ग आहेत. कधीकधी जातपंचायत मुलगी ‘शुद्ध’ आहे असं मुलगा खोटच सांगतो आहे असे म्हणते. मग सर्वांसमोर चाचणी करण्यास मुलीला भाग पाडतात.
त्यासाठी ते मुलीला श्वास रोखून पाण्यात उभे करतात. एक तटस्थ माणूस म्हणजे जो मुलगा आणि मुलगी या दोघांशी संबंधित नाही त्याला शंभर पावले चालायला लावतात. तोपर्यंत ती मुलगी पाण्याखाली श्वास रोखून थांबली पाहिजे. ती मुलगी तसे करू शकली तर ‘शुद्ध’ नाहीतर ‘अशुद्ध’!
एवढ्यावरच ते थांबत नाही तर अजून एक प्रकारची चाचणी आहे. मुलीच्या हातात दोन किलो वजनाचा लोखंडी तुकडा द्यायचा. त्यासाठी हातावर आधी पान आणि मग त्यावर पीठ ठेवून हा तप्त लोखंडी तुकडा ठेवला जातो. मग त्या मुलीला काही अंतर चालायला सांगितले जाते.
जर त्या मुलीचे हात भाजले नाहीत तर ती ‘शुद्ध’ आणि हात भाजले तर ती ‘अशुद्ध’! या सर्व नीच प्रकारांनी त्या मुलीला अत्यंत शारीरिक त्रास सहन करावा लागतो. शिवाय तिच्या मनावर जे आघात होतात त्याची भरपाई तर शक्यच नाही.
वरील प्रकार वाचले तर कुठल्याही सुसंस्कृत व्यक्तीच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. आजच्या युगात जर आपण स्त्रीला अशी वागणूक देत असू तर आपण प्रगती करत आहोत असं म्हणताच येणार नाही.
ही प्रथा एक कलंक आहे, जी काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जपली आहे. परंतु या घटना नेहमीच सर्वांसमोर येत नाही, त्यामागे असणारे सोयीस्कर मौन हे सर्वांसाठी घातक आहे. असल्या घाणेड्या प्रथांचा नायनाट फक्त बोलून होणार नाही तर कृती महत्वाची आहे.
*कौमार्य चाचणी करण्याचे हे वाईट प्रकार आजही चालू आहेत, हे खरंसुद्धा वाटणार नाही...*
*विचारवेध - BEYOND THOUGHTS.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
19 एप्रिल 2022.
Comments
Post a Comment