*"मंदिरे ही पैसा कमावण्याचा कारखाना झाली आहेत का?" असा प्रश्न पडतो.*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - मनिष वैद्य. 21 एप्रिल 2022.
*"मंदिरे ही पैसा कमावण्याचा कारखाना झाली आहेत का?" असा प्रश्न पडतो.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार - मनिष वैद्य.
21 एप्रिल 2022.
(ही माझी वैयक्तिक मते असून यात कुणाचा अनादर करण्याचा विचार नाही किंवा माझी मते अंतिम असून आपण स्वीकारली पाहिजे असा आग्रह देखील नाही. फक्त एक विचार मांडत आहे. सकारात्मक चर्चा व्हावी हीच इच्छा.)
सर्वप्रथम मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, की मी मंदिरांच्या विरोधात नाही. एक हिंदू म्हणून मला मंदिरांबाबत आस्था आणि जिव्हाळा आहे. मात्र आजच्या मंदिरांची अवस्था मला अस्वस्थ करते.
‘मंदिरे ही पैसा कमावण्याचे कारखाने झाले आहेत की काय?’ असा प्रश्न मला कधीकधी पडतो. मंदिरांपासून पुजाऱ्यांना कमवायचे आहे, व्यापाऱ्यांना कमवायचे आहे आणि अगदी सरकारला कमवायचे आहे. या सगळ्यात आस्था कुठे आहे? पावित्र्य कुठे आहे? दोन तास रांग लावायची आणि दोन सेकंद दर्शन घ्यायचे. यात कोणते अध्यात्मिक समाधान प्राप्त होते आपल्याला?
१) मंदिरांचे पावित्र्य राखायचे असेल, तर मंदिरांत सारखे सारखे जाऊ नये असे माझे मत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील देव्हारा पुजावा. म्हणजे घर हेच एक मंदिर होईल. घरातील देव जागते करा. रोज जेवण बनवले, की घरातील अन्नपूर्णेला नेवेद्य दाखवा आणि मग ग्रहण करा.
२) मंदिरात जाल तेव्हा देवाला नारळ, फुले वाहू नका, वस्त्रे अर्पण करू नका असे माझे मत आहे. फुले वाहून मंदिर सुगंधी आणि सुशोभित करणे हे मंदिर व्यवस्थापनाचे काम आहे तुमचे नाही.
सगळेजण फुले वाहून फुलांचा ढीग तयार होतो आणि मूर्तीचे पावित्र्य नष्ट होते. देवाची मूर्ती अगोदरच अतिशय साजरी दिसेल अशीच बनवलेली असते. तिला कपडे घालून आपण काय मिळवतो?
३) मंदिरात अनावश्यक आवाज होणार नाही यासाठी स्वतः जागरूक रहा आणि मंदिर व्यवस्थापनास देखील आपला आग्रह मांडा. मंदिरात गेलाच, तर तेथे थोडा वेळ ध्यानधारणा करता येईल इतपत शांतता असावी हा आग्रह चुकीचा आहे का? अर्थात आरतीच्या वेळी होणारा आवाज काही गैर नाही, पण इतर वेळी शांतता हवीच.
४) मंदिर परिसर स्वच्छ असावा याबाबत आग्रही रहा. फेरीवाले, भिकारी, विक्रेते हे मंदिर परिसरात राहू नये असे वाटत असेल, तर त्यांच्याकडून काही खरेदी करू नका. भिकाऱ्यांना भीक देऊ नका. आपोआपच ही माणसे निघून जातील. परिसर शांत होईल. स्वच्छता वाढेल. सगळ्यांना चांगला अध्यात्मिक अनुभव घेता येईल.
५) मंदिरात अन्नदान किंवा कोणतीही पूजा करू नका. या सर्व पूजा स्वतःच्या घरात करा. पूजा घरात होतील तेव्हा वास्तुपुरुष प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल.
अन्नदान म्हणजे आपण ज्यांना ओळखतही नाही अशा व्यक्तींना खाऊ घालणे असा अर्थ कसा काढतो आपण? अन्नदान म्हणजे आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांना बोलावून त्यांना तृप्त करणे होय. समजा अजून वेगळे अन्नदान करायचे असेलच तर अनाथाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी अन्नदान करावे.
लक्षात घ्या पूजा, अन्नदान घरात केले तर तो एक सोहळा होतो आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. या सकारात्मक लहरी घरातील, कुटुंबातील व्यक्तींसाठी फार आवश्यक असतात.
५) आता सर्वात महत्वाचा विषय. मंदिरांना दान द्यावे किंवा नाही? लक्षात ठेवा परमेश्वराला तुमच्या पैशाची मुळीच गरज नाही. तेव्हा मंदिरांना दान करतांना आपण देवाला काहीतरी देतोय ही खुळचट कल्पना मनातून काढून टाका.
मंदिराची स्वच्छता, देखभाल, पूजाअर्चा करणारी माणसे यांचा पगार निघावा एवढेच मंदिरांना income असावे. जी मंदिरे सरकारी देखरेखीखाली आहेत त्यांना दान देण्याची काय आवश्यकता आहे? आपल्या कररूपी पैशातूनच त्यांची देखभाल होते म्हणजे आपण अप्रत्यक्ष त्यांना दान देत आहोतच ना?
जी मंदिरे सरकारी देखरेखीखाली नाहीत त्यांना दान द्या, पण एका वेळी १ रु प्रति व्यक्ती यापेक्षा जास्त देऊ नका. म्हणजे पैशासाठी मंदिरांचे राजकारण करणारी माणसे आपोआपच मंदिरांपासून दूर जातील. सेवभावाने जी मंडळी मंदिरांची व्यवस्था पाहण्यास तयार असतील (सेवानिवृत्त वृद्ध व्यक्ती) अशी माणसे पुढे येतील.
*पटलं तर व्हयं म्हणा आणि शक्य असेल तर अंमलबजावणी करा.*
...साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
21 एप्रिल 2022.
Comments
Post a Comment